नाशिकवरून पुन्हा खलबतं, दोन नेते मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलं; काय निर्णय होणार?
Google News | Join WhatsApp | Join Telegram | View ePaper |
Panchayat Swaraj Samachar News Desk.
नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा गटाने नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. नाशिकच्या जागेसाठी दिल्लीतूनच माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, असा दावा अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमधून पत्ता कट झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नाशिकची सीट मिळावी म्हणून हेमंत गोडसे यांच्याकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. आधी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर हेमंत गोडसे यांनी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा हेमंत गोडसे यांना भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे या भेटीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावून घेतलं आहे. तातडीने मुंबईला या असा निरोप मिळाल्यानंतर गोडसे हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलपही आहेत. हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार असून मुख्यमंत्र्यांशी नाशिकच्या जागेवरून चर्चा करणार आहेत. त्यामुळे नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळणार का? की हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावलं? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात याबाबतचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, बबनराव घोलप हे सुद्धा गोडसे यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाले आहेत. गोडसे यांना तिकीट द्यावं म्हणून घोलप हे मुख्यमंत्र्यांचं मन वळवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे घोलप यांच्याही प्रयत्नांना यश येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Google News | Join Facebook | Live | 24/7 Help Desk |